लोहारा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
लोहारा :शाहिद पटेल
तालुक्यात गेल्या सव्वा महिन्यापासून एकही समाधानकारक पाऊस न झाल्याने हजारो हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाअभावी शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे लोहारा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी लोहारा तालुका स्वराज्य संघटनेच्या वतीने उमरगा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लोहारा तालुक्यात पावसाळा चालू झाल्यापासून एकही मोठा पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. कर्ज काढून खरीप हंगामात पेरणीसाठी खरेदी केलेल्या कृषी निविष्ठा जशास तशा पडून आहेत. पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी एकदाही मोठा समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दररोज दमदार पाऊस पडेल यासाठी शेतकरी आभाळाकडे नजरा लावून बसले आहेत. परंतु,
स्वराज्य संघटनेचे निवेदन
पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन तालुक्यात चारा छावणी सुरू करावी. तसेच मागील वर्षीचा खरीप व रब्बीचा राहिलेला पिक विमा त्वरित शेतकऱ्यांना देण्यात यावा, शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणीक फीस माफ करण्यात यावी, वाळलेल्या उसाचे पंचनामे करून मदत देण्यात यावी, लोहरा तालुक्यात दुष्काळ जाहिर करून सरसकट शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मदत करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर स्वराज्य संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत थोरात, उपाध्यक्ष तानाजी पाटील, कार्याध्यक्ष युवराज साळुंके, सचिव बळी गोरे, संजय मुरटे, शेतकरी बालाजी मुळे, महेश सुतार, राजाभाऊ मुळे यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.
0 Comments