अचूक जनगणनेसाठी सजग राहून काम करा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण सत्र सुरू
लातूर, दि. २६ : ज्याप्रमाणे निवडणुकांचे आयोजन महत्त्वाचे असते, त्याचप्रमाणे जनगणना ही प्रक्रिया देखील देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक मूल्यमापन करणाऱ्या या प्रक्रियेतूनच देशाच्या विकासाचा खरा रोडमॅप तयार होतो. त्यामुळे जनगणनेच्या कामात सर्वांनी सजग राहून, अचूक नियोजन करावे आणि कोणतीही दिरंगाई करू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले.
भारताची जनगणना २०२७ अंतर्गत तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांच्या दुसऱ्या टप्प्यातील तीन दिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले आहे. या सत्राच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या प्रशिक्षण सत्राला जनगणना संचालनालयाचे सहसंचालक रमेश भोसले, मिलिंद पाटील, लातूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा जनगणना समन्वयक विठ्ठल परब यांच्यासह जिल्ह्यातील २३ चार्ज अधिकारी आणि १०६ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
जनगणना ही केवळ आकडेवारी नसून ते देशाचे सामाजिक आणि आर्थिक प्रतिबिंब आहे. प्रत्येक घर आणि प्रत्येक कुटुंब जनगणनेत समाविष्ट होईल याची दक्षता घ्यावी. प्रगणकांनी अचूक काम करावे यासाठी त्यांना दर्जेदार प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. प्रगणकांनी लोकांशी संवाद साधताना सकारात्मक राहावे, जेणेकरून जनतेचा प्रत्यक्ष सहभाग वाढेल. सर्व चार्ज अधिकारी आणि प्रशिक्षणार्थींनी आपापसात समन्वय ठेवून हे काम यशस्वी करावे. दहा वर्षांनंतर येणारी ही जनगणनेची प्रक्रिया देशसेवेची एक मोठी संधी आहे. प्रशिक्षणातील सूक्ष्म गोष्टी समजून घ्या आणि कोणतीही समस्या असल्यास त्याचे वेळीच निरसन करून घ्या. या कामात कसलाही हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जनगणना संचालनालयाचे सहसंचालक रमेश भोसले यांनी उपस्थितांना तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन केले. त्यांनी जनगणना कायदा, चार्ज अधिकारी यांची वैयक्तिक जबाबदारी, घरांची निवड, इमारतींना क्रमांक देण्याची पद्धत आणि जनगणनेतील विविध टप्प्यांची सविस्तर माहिती दिली.
****



0 Comments