रेल्वे बोगी कारखान्यातील रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य द्या
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· जुन्या सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीला गती देण्याचे निर्देश
· शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रेल्वेची जागा देण्याबाबत तोडगा काढणार
लातूर, दि. ११ (प्रतिनिधी): लातूर जिल्ह्यात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी रेल्वे बोगी कारखान्याची उभारणी करण्यात आली आहे. या कारखान्यात लवकरच वंदे भारत रेल्वेच्या बोगींचे उत्पादन सुरू होणार असून, यामुळे सुमारे दहा हजार रोजगार निर्माण होतील. यामध्ये स्थानिक युवक-युवतींना प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या जिल्ह्यातील विकास कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे, आमदार विक्रम काळे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर, माजी आमदार गोविंद केंद्रे, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्रीमती मानसी यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत लातूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजना, जिल्हा रुग्णालय आदीबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.
रेल्वे बोगी कारखान्यासाठी स्थानिक स्तरावर कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील आयटीआय आणि पॉलिटेक्निक संस्थांमध्ये आवश्यक ट्रेड्स सुरू करून युवकांना प्रशिक्षण द्यावे. यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रेल्वेची जागा हस्तांतरित करण्याबाबत रेल्वे प्रशासनासोबत बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
उदगीर येथील शासकीय दूध भुकटी प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. मदर डेअरीच्या सहकार्याने हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव सादर करावा, त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद केले. जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी जुन्या सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीची कामे गतीने पूर्ण करावीत. घरणी, तिरू आणि देवर्जन या प्रकल्पांतून जलवाहिनींद्वारे सिंचनासाठी पाणी वितरण करण्याबाबत उपयुक्तता तपासून प्रस्ताव सादर करावा, असे त्यांनी सांगितले. तसेच, हाडगा आणि मसलगा सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या करावीत. काही ठिकाणी पांदण रस्त्यांवर विद्युत खांब लावण्यात आले आहेत. हे खांब तातडीने हटवून रस्त्यावरील अडथळे दूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक विकास कामांची माहिती दिली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्ह्यात सुरु असलेली विकास कामे, तसेच प्रस्तावित कामांविषयी माहिती सादर केली.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
लातूर, दि. ११ : लातूर जिल्हा परिषद परिसरात उभारण्यात आलेल्या लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार विक्रम काळे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार धनंजय मुंडे, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, आमदार संजय केणेकर, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महापालिका आयुक्त श्रीमती मानसी यांची उपस्थिती होती.
प्रारंभी कार्यक्रमस्थळी भारतीय संविधानाची प्रत देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले. स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तसेच पुतळ्याच्या नामफलकाचे अनावरण त्यांनी केले. माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या जिल्हा परिषद परिसरातील पुतळ्यासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
जिल्हा परिषदेच्यावतीने उभारण्यात आलेल्या लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याची उंची १४ फूट असून कांस्य (ब्राँझ) धातुने बनविलेला हा पुतळा ९०० किलो वजनाचा आहे. ३४५१.५६ चौ.मी. जागेत पुतळा उभारण्यात आला आहे. या परिसरात सुशोभिकरण व आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. शिल्पकार विजय बोंदर व अंबादास पायघन यांनी पुतळा तयार केला. कार्यक्रम प्रसंगी अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
****
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
0 Comments