जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावीच्या प्रवेश परीक्षा
ऑनलाईन अर्ज भरण्यास 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
लातूर, दि. 10 (जिमाका) : जवाहर नवोदय विद्यालयामध्ये 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सहावीतील प्रवेशासाठी अर्ज भरण्यास 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेची सर्व माहिती https://navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेश परीक्षा 29 एप्रिल 2023 रोजी जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर होईल.
प्रवेश अर्ज निशुल्क ऑनलाइन भरण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रथम नवोदय विद्यालय समितीच्या वेबसाइटवरील प्रमाणपत्र डाऊनलोड करून घ्यावे. या प्रमाणपत्रावर पाचवीत शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा सही शिक्का, पालकांची सही, विद्यार्थ्याची सही व फोटो असणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज https://cbseitms.rcil.gov.in/
इयत्ता सहावीसाठी निवड चाचणी परीक्षेस बसणारा विद्यार्थी इयत्ता तीसरी, चौथीमध्ये सलगपणे उत्तीर्ण होऊन कोणताही खंड न पडता शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये पाचवीमध्ये लातूर जिल्ह्यात शिकत असावा. त्याचा जन्म दिनांक 1 मे 2011 ते 30 एप्रिल 2013 (दोन्ही दिवस पकडून) दरम्यानचा असावा. त्याचे पालक लातूर जिल्ह्याचेच रहिवासी असावेत, अन्यथा ते प्रवेश अर्ज भरण्यास अपात्र असतील.
इतर मागास प्रवर्गात अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांनी मार्च 2023 पूर्वी भारत सरकारचे इतर मागास प्रवर्गाचे (ओ. बी. सी.- फॉर्म नंबर 09) जात प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे. ज्या पालकांनी दिनांक 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज भरतांना लिंग (मुलगा/मुलगी), प्रवर्ग (सामान्य/इतर मागास/अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती), क्षेत्र (ग्रामीण/शहरी), दिव्यांगता आणि परीक्षेचे माध्यम चुकीचे भरले असल्यास ते दिनांक 16 फेब्रुवारी 2023 आणि 17 फेब्रुवारी 2023 रोजी संकेतस्थळावर लॉगिन करून ऑनलाइन दुरुस्ती करू शकतात. दिनांक 17 फेब्रुवारी 2023 नंतर कोणताही बदल करता येणार नाही याची दक्षता घ्यावी.
अधिक माहितीसाठी लातूर जवाहर नवोदय विद्यालायचे प्रवेश परीक्षा प्रभारी बी. डी. शेख (भ्रमणध्वनी क्र. 9817834930) किंवा व्ही. एच. खिल्लारे (भ्रमणध्वनी क्र. 9860568840) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आर रामू यांनी केले आहे.
*****
स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी
प्रवेशिका आणि पुस्तके पाठविण्यासाठी 2 मार्चपर्यंत मुदतवाढ
लातूर, दि. 10 (जिमाका) : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी 2022 या प्रकाशन वर्षासाठी राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात पाठविण्यासाठी 2 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 31 जानेवारीपर्यंत होती.
दिनांक 1 जानेवारी, 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सवानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई-400 025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील.
महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 'नवीन संदेश' या सदरात 'स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2022 नियमावली व प्रवेशिका' या शीर्षाखाली व 'What's new' या सदरात 'Late Yashwantrao Chavan State Literature Award 2022 Extension of period for sending Books and Application Form' शीर्षाखाली आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ http://sahitya.marathi.gos.in या संकेतस्थळावर प्रवेशिका नियमपुस्तिका उपलब्ध होतील. प्रवेशिका पूर्णतः भरून आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 2 मार्च 2023 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक किंवा प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात.
मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक किंवा प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400 025 येथे पाठवाव्यात. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक किंवा प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हे साहित्य दिनांक 2 मार्च 2023 पर्यंत पाठवावे, असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे.
लेखक किंवा प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर, पाकीटावर ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2022 साठी प्रवेशिका' असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतिम दिनांक 2 मार्च, 2023 हा राहील. विहित कालमर्यादेनंतर (दिनांक 2 मार्च 2023) येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत, असे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सचिव यांनी कळविले आहे.
****
प्राथमिक अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकामार्फत
सन 2013-14 ते सन 2020-21 चे डीसीपीएस पावत्यांचे वितरण
अधिकारी, कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार
लातूर, दि.10 (जिमाका) : नुकतेच लातूर प्राथमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक या कार्यालयाकडून लातूर जिल्ह्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सन 2013-14 ते सन 2020-21 या अर्थीक वर्षातील डीसीपीएस पावत्यांचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम लातूर जिल्हा भारत स्काऊट गाईड कार्यालयात झाला. लातूर शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वंदना फुटाणे यावेळी उपस्थित होत्या.
यावेळी लातूर येथील श्री व्यंकटेश प्राथमिक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक माधव गंगाधर मरशिवणे यांनी डीसीपीएस कामकाजामध्ये मोलाचे सहकार्य केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी (प्रा.) यांनी शैक्षणिक गुणवत्ता व प्रशासकीय कामकाजाविषयी मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर या प्रसंगी पद्मिनी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शेख इस्माईल कादरसाब यांनी सर्व शिक्षकांच्यावतीने मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विश्वकर्मा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एस. एम. नवघरे यांनी केले. प्रास्ताविक लातूर वेतन व भविष्य निर्वाह निधीचे पथक (प्राथमिक) अधीक्षक ए. ए. कदम यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी वेतन व भविष्य निर्वाह निधीचे पथक (प्राथमिक) कार्यालयातील अधिक्षक ए. ए. कदम, सहाय्यक लेखाधिकारी के. व्ही. डोलारे, कनिष्ठ लिपीक जी. बी. लवटे, कनिष्ठ लिपीक डी. एच. मुदगल, सेविका श्रीमती एस. एस. पाटील, श्रीमती पी. पी. पिटले यांनी परिश्रम घेतले.
****
अटल भूजल योजनेतंर्गत निलंगा येथे
तालुकास्तरीय क्षमता बांधणी प्रशिक्षण उत्साहात
लातूर, दि.10 (जिमाका) : केंद्र शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने अटल भूजल योजना जलसुरक्षा आराखडा अंमलबजावणी याविषयावर एक दिवसीय तालुकास्तरीय क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम निलंगा येथील श्री अटल बिहारी सभागृहात नुकताच झाला. भूजल सर्वेक्षण आणि विकाय यंत्रणा कार्यालयामार्फत या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. निलंगा उपविभागीय अधिकारी श्रीमती शोभा जाधव यांच्या हस्ते अटल कलश पूजनाने प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले.
भूजल सर्वेक्षण आणि विकाय यंत्रणेचे वरिष्ठ भूजल वैज्ञानिक तथा अटल भूजल योजना जिल्हास्तरीय समन्वय समितीचे सदस्य सचिव एस. बी. गायकवाड, निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यावेळी उपस्थित होते.
अटल भूजल योजना गावात यशस्वीपणे राबविणेसाठी गावातील जलसुरक्षा तसेच भूजल मित्र यांनी सहकार्य करावे. तसेच केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजनाचे अभिसरण करून गावस्तरावर भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्रीमती जाधव यांनी केले.
उपविभागीय मृद व जलसंधारण कार्यालायचे प्रदीप काळे यांनी मृद व जलसंधारण कामा विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. पंचायत समिती पशुसंवर्धन कार्यालयाचे बी. टी. सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांसाठी पशुधनाबाबत राबविण्यात येणाऱ्या योजनाची माहिती दिली.
गट विकास अधिकारी श्री. ताकभाते यांनी ग्रामीण भागात पाण्याचे नियोजन, पाण्याचा वापर व पुनर्भरण आणि जलजीवन मिशन अंर्तगत हर घर जल योजनेबद्दल मार्गदर्शन केले. तसेच अटल भूजल योजनेसाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. लोकसहभागानुसार गावाचा पाण्याचा ताळेबंद मांडून सूक्ष्म सिंचन पध्दतीचा वापर केल्यास पिकांना कमी पाणी लागून उत्पनात वाढ होते. शिवाय कमी पाणी लागणाऱ्या पिकाची लागवड करून गावाचा सर्वांगिण विकास साध्य करावा, असे आवाहन श्री. ताकभाते यांनी केले.
वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री. गायकवाड यांनी जलसुरक्षा आराखड्यामध्ये समाविष्ट विविध संलग्न विभागातील प्रस्तावित कामांची माहिती देवून अटल भूजल योजनेतंर्गत गावस्तरावरील पर्जन्यमापक यंत्र, बॉटल लेव्हल इंडिकेटर, रिर्चाज शाफ्ट आदी विषयांची माहिती दिली.
मौजे जाजनूर येथील प्रगतशील शेतकरी बालाजी गोमसाळे यांनी शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करून शेती केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ होवून शेतकऱ्यांनी शेतीसोबत शेतीशी निगडीत जोडव्यवसाय करावा असे आवाहन केले.
जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षातील अक्षय पटारे, चंद्रशेखर सूरवसे भूजल तज्ञ, बालाजी गोरपल्ले कृषी तज्ज्ञ, शुभम शिंदे जलसंधारण तज्ज्ञ, रियाज पठाण हे यावेळी उपस्थित होते. तसेच जिल्हा अंमलबजावणी भागीदारी संस्थांचे कुलदिप कांबळे, प्रकल्प समन्वयक विषय तज्ज्ञ व गौतम सोनकांबळे समूह संघटक व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षातील शिक्षण संवाद तज्ज्ञ एच. आर. नाईक यांनी सूत्रसंचालन केले.
****
पशुसंवर्धन विभागामार्फत बियाणे वाटपाकरिता
लाभार्थी निवडीसाठी 15 फेब्रुवारी रोजी सोडत
लातूर, दि.10 (जिमाका) : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षीक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत दुभत्या जनावरांसाठी खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम या योजनांतर्गत बियाणे वाटप करण्यात येणार आहे.
या योजनेसाठी इच्छुक लाभार्थ्यांकडून यापूर्वी तालुकास्तरावर अर्ज मागविण्यात आले होते. या अर्जांमधून लाभार्थ्यांची सोडत पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. यासाठी 15 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी तीन वाजता लातूर जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्या कक्षात सोडत होणार असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी कळविले आहे.
*****

0 Comments